सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?   

भारत-पाकिस्तानमधील अलीकडच्या लष्करी संघर्षांदरम्यान पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून पुन्हा एकदा स्वातंत्र्याची हाक देण्यात आली आहे. सिंध प्रांतातील पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ७२ वर्षांपासूनच्या या मागणीला आणखी बळ मिळाले आहे. तीव्र आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानला आता देशातील फुटीरतावादी प्रवृत्तींना आळा घालणे कठीण झाले आहे. 
 
काय आहे ही चळवळ?
 
सिंध प्रांतातील नागरिक वेगळी भाषा, संस्कृती आणि अधिकारांसाठी लढत आहेत. पाकिस्तानी सरकार विशेषत: पंजाबमधील नेतृत्व दुजाभाव करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली. त्याचवेळी स्वतंत्र सिंधूदेशाची मागणी करण्यात आली होती. १९६७ मध्ये सिंधूदेशाची मागणी उफाळून आली. बलूच आणि पश्तूनांप्रमाणेच सिंधी नागरिक त्यांच्या भूभागावर राजकीय-आर्थिक अधिकार तसेच पाकिस्तानी कब्जा आणि धार्मिक कट्टरतावादापासून मुक्तता मागत आहेत. 
 
१९७२ मध्ये संघर्षासाठी सुरूवात
 
१९७२ मध्ये गुलाम मूर्तझा सय्यद या सिंध भाषक नेत्याने ‘जिये सिंध तहरीक’ अशी चळवळ सुरू करून वेगळ्या सिंधूदेशाची मागणी लावून धरली.  बंगाली भाषकांचा बांगलादेश निर्माण झाला. तसाच आम्हा सिंधी भाषकांचा  वेगळा सिंधुदेश हवा, अशी त्यांची मागणी होती. पाकिस्तान सरकारने सय्यद यांना त्यांच्या घरातच कैद करून त्यांच्या असंख्य अनुयायांना ठार मारले. 
 
सिंधी नागरिकांच्या समस्या
 
पंजाबी सैन्य दिवसाढवळ्या राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, विद्यार्थी नेत्यांचे अपहरण करत आहे. महिलांची छेडछाड, बलात्कार तसेच न्यायालयाबाहेरील हत्याही थांबत नाहीत. सिंधी, बलुच आणि पश्तून तरुणांचा क्रूरपणे छळ केला जात आहे. सिंधी आणि बलुच राष्ट्रे पंजाबी सैन्याच्या हातून सर्वात वाईट प्रकारच्या दडपशाहीला तोंड देत आहेत. 
 
सरकारविरोधात चळवळ तीव्र
 
सिंधी अल्पसंख्याक समुदायाला पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनेकडून बराच काळ छळ सहन करावा लागला आहे. बळजबरीने उर्दू भाषा लादणे, जमिनी हडप करणे, मारहाण, अपहरण तसेच दडपशाहीद्वारे त्यांची स्थानिक संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न या सर्वांमधून मुक्ती मिळविण्यासाठी सिंधी नागरिकांनी   सिंधूदेश चळवळ तीव्र केली आहे. आतापर्यंत बहुतांश आंदोलने शांततेच्या मार्गाने झाली. मात्र आता नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. अलीकडेच जय सिंध फ्रीडम मूवमेंटने राष्ट्रीय महामार्गावर धरणे आंदोलन केले होते. 
 
धर्मांतराची समस्या 
 
सिंधमध्ये धार्मिक कट्टरतावादाची समस्या मोठी आहे. हिंदू, अहमदी आणि ख्रिश्चनांना धर्मांतर करण्यास किंवा देश सोडून जाण्यास भाग पाडले जाते. हे काम थेट पाकिस्तानी सैन्याच्या देखरेखीखाली चालते. सिंधी राष्ट्रवादी पक्ष या  घटनांचा मोठ्या प्रमाणात निषेध करतात; परंतु धर्मांतराची प्रक्रिया थांबविण्यास ते तयार नाहीत. पाकिस्तान सरकारच्या छळाला कंटाळून सिंधी, बलुच आणि पश्तून हे अल्पसंख्याक समुदाय बर्‍याच काळापासून त्यांच्या स्वतंत्र राज्यांच्या निर्मितीची मागणी करत आहेत. 
 
सैन्याची तैनाती   
 
सिंधमध्ये पंजाब प्रांतातील सैन्याची तैनाती सर्वात मोठी आहे. तिथे १९ प्रमुख लष्करी छावण्या आणि असंख्य लहान गुप्तचर आणि अंमलबजावणी विभाग आहेत. पंजाबने आपल्या लष्करी सामर्थ्याने आणि दहशतवादी इस्लामी धर्मशाहीच्या माध्यमातून ऐतिहासिक सिंधी, बलुच आणि पश्तून राष्ट्रांवर आपला साम्राज्यवादी कब्जा प्रस्थापित केला आहे.  
 
सहभागी संघटना
 
या आंदोलनात जय सिंध फ्रीडम मूवमेंट, जय सिंध कौमी महाज, सिंधूदेश लिबरेशन आर्मी, जय सिंध विद्यार्थी संघटना यासारख्या संघटनांचा समावेश आहे. या संघटनांना सिंध प्रांत पाकिस्तानपासून वेगळा हवा आहे.

Related Articles